फडणवीसांनी दिले अधिकार्यांवरील कारवाईचे निर्देश
पिंपरीः महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मातंग समाजातील नागरिकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. यामुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी संबंधित विभागाला कडक निर्देश देण्याची मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकार्यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर अधिवेशनात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले होते. यावेळी नितीन दिनकर, चंद्रकांत काळोखे, आनंद खंडागळे, भारत पवार, सचिन आरोटे, बालाजी गवारे, भानुदास नेटके, प्रवीण मिसाळ, अमोल कुचेकर, शेखर साळवे, विनायक मोहिते, विलास शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
लक्ष घालण्याची केली मागणी
निवेदनात गोरखे यांनी म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात मातंग समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील घटना असेल किंवा आळंदी येथील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या असेल. अशा घटनांमुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. मातंग समाज रस्त्यावर उतरुन या घटनांचा निषेध करत आहे. त्यामुळे या विषयांमध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालावे. समाजावरील अन्याय दूर होण्यासाठी संबंधित विभागाला व अधिकार्यांना कडक आदेश देण्यात यावेत. समाजावरील होत असलेले अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी तातडीने योग्य ती मदत करावी.
निवेदनाची घेतली दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राची त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकार्यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील मातंग समाजावर अन्याय झाला असल्यास भविष्यात अन्याय होऊ नये याकरिता संबंधित विभाग तसेच अधिकार्यांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर यांनी गोरखे यांना पाठविले आहे.